'जेव्हा काँग्रेस पक्ष करेल बंड, तेव्हा उद्धव ठाकरेंचे सरकार पडेल थंड. लवकरच होणार आहे या सरकारमध्ये बिघाडी, जाणार आहे महाविकास आघाडी..... अशा आपल्या खास शैलीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचा समाचार घेतला. ‘राज्यातील सरकार पडले, तर आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार बनवणार आहोत,' असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
नगरमध्ये आज,सोमवारी विविध कार्यक्रमानिमित्त आठवले सरकारी विश्रामगृहावर आले असता पत्रकारांशी बोलत होते. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष अजय साळवे, जिल्हाध्यक्ष सुनील साळवे आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी युपीएच्या अध्यक्ष पदावर यावे, या मागणीबाबत बोलताना आठवले म्हणाले, ‘सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. राहुल गांधी काँग्रेसचे नेते आहेत. त्यामुळे शरद पवार यांना यूपीए अध्यक्ष पद देण्याची शिवसेना नेते संजय राऊत यांची मागणी योग्य नाही. या मुद्द्यावरून काँग्रेस उद्धव ठाकरे सरकारचा पाठिंबा काढू शकते. राऊत यांच्या मागणीमुळे सरकारमध्ये मतभेद होतील, व हे सरकार पडू शकते,' असे मतही त्यांनी व्यक्त केले.
‘राष्ट्रवादी हा महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. शरद पवार यांच्याबाबत मला आदर आहे. ते सक्षम असणारे नेते आहेत. पण पवार यांना यूपीएच्या अध्यक्षपद मिळणे अशक्य आहे,’ असे सांगतानाच, 'काँग्रेसमध्ये स्वाभिमान असेल, तर ते त्यांचा वेळोवेळी अपमान होत असताना, त्यांना कमी लेखले जात असताना, महाविकास आघाडीत का राहतात ?’ असा प्रश्नही आठवले यांनी उपस्थित केला.
‘राज्यातील सरकारचा काँग्रेसने पाठिंबा काढल्यानंतर हे सरकार पडेल, व आम्हाला सरकार बनण्याचा मार्ग मोकळा होईल. त्यासाठी कोणता पक्ष, आमदार आमच्याकडे येऊ शकतात, ते आम्ही पाहू व बहुमत सिद्ध करून दाखवत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार बनवणार आहे, असेही आठवले यांनी स्पष्ट केले.
....
कायदा बनवणे हा ज्या त्या राज्याचा अधिकार
उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या लव्ह जिहाद कायद्याच्या बाबतीत यावेळी मंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केले. ते म्हणाले, 'कोणता कायदा करायचा, हा ज्या त्या राज्याचा अधिकार आहे. लव्ह जिहाद हा कायदा केवळ लग्नासाठी धर्मपरिवर्तन होऊ नये, असाच सांगणार आहे.' दरम्यान, या कायद्याला तुमचा पाठिंबा आहे का ? असे विचारले असता, ' कायदा बनवणे तो ज्या त्या राज्याचा अधिकार असल्याचे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले.'
....
|
टिप्पणी पोस्ट करा