Diwali: तुम्हाला दिवाळीचे हे महत्त्व माहित आहे का ?

 


आश्विन वद्य त्रयोदशी (धनत्रयोदशी), आश्विदन वद्य चतुर्दशी (नरक चतुर्दशी), अमावास्या (लक्ष्मीपूजन) व कार्तिक शुद्ध प्रतिपदा (बलिप्रतिपदा) असे चार दिवस दिवाळी साजरी केली जाते. काही जण त्रयोदशीला दिवाळीत न धरता, दिवाळी उरलेल्या तीन दिवसांची आहे, असे समजतात. वसुबारस आणि भाऊबीज हे दिवस दिवाळीला जोडून येतात, म्हणून त्यांचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तुत: ते सण वेगवेगळे आहेत. असे मानले जाते. 

कृष्णाने नरकासुराचा वध केला तेव्हापासून नरकचतुर्दशी साजरी करतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मीचा नाश व्हावा, यासाठी धार्मिक कृती करतात. बलीप्रतिपदा हा दिवस बली राजाचा नाश झाल्याचे प्रतीक आहे. तर भाऊबीज ही शकटासुर या असुराचा नाश करून असंख्य भगिनींना त्यांचा बंधू कृष्ण याने सोडवल्याचा आनंद म्हणून साजरी करतात. अशा त-हेने दीपावलीचा प्रत्येक दिवस हा असुरांचा संहार केल्याच्या, धर्माने अधर्मावर विजय मिळवल्याच्या दिवसाची आठवण म्हणून मंगलमय दीपांनी उजळवायचा, असं आपली संस्कृती सांगते.

चातुर्मासाच्या काळात तेजतत्त्वाचा अभाव असल्यामुळे तेजोमय शक्तीजतून विघटित होत असलेले घटक जास्त प्रमाणात वाढण्यास सुरुवात होते. दिवाळीच्या काळापर्यंत या घटकांची विपुल प्रमाणात वृद्धी झालेली असते. त्यामुळे पूर्वीच्या काळी मोठमोठ्या राक्षसांचे साम्राज्य या काळात वाढायचे. या सर्व घटकांचे सूक्ष्म स्तरावर क्षमन व्हावे; म्हणून दिवाळी केली जाते, म्हणजेच तेजतत्त्वावर आधारित उपासना केली जाते. या प्रकारच्या उपासनेमुळे तेजाच्या अभावी वाढलेल्या त्रासदायक घटकांचा तेजाच्या बलावर नाश होतो.

दीपावलीच्या सायंकाळी घरात व घराबाहेर दिव्यांची ओळ लावावी. दीपावली म्हणजे दिव्यांची ओळ. यामुळे घराला अप्रतिम शोभा निर्माण होऊन उत्साह येतो व आनंद होतो. विजेच्या दिव्यांची माळ लावण्यापेक्षा तेल व वातीच्या पणत्या लावण्यात शोभा व शांतपणा जास्त आहे. दीप या शब्दाचा खरा अर्थ तेल व वात यांची ज्योत. `अंधाराकडून ज्योतीकडे म्हणजे प्रकाशाकडे जा`, अशी श्रुतीची आज्ञा आहे.  `तमसो मा ज्योतिर्गमय`. या तीन दिवसांत ज्यांच्या घरी दिवे लागत नाहीत त्यांच्या घरी नेहमीच अंधकार रहातो. ते प्रकाशाकडे म्हणजे ज्ञानाकडे जाऊ शकत नाहीत. दीपदानाने लक्ष्मी स्थिर होते. आपल्या घरी सदैव लक्ष्मीचा वास व ज्ञानाचा प्रकाश असावा यासाठी प्रत्येकाने आनंदाने दीपावली उत्सव साजरा करावा. याने घरात सुखसमृद्धि रहाते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने