Mumbai : ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन



ब्युरो टीम :  ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून २१ ते ६५ वर्षे वयागटातील सर्व पात्र महिलांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी केले आहे.

राज्य शासनाने या योजनेंतर्गत अर्ज करण्याची मुदत १५ जुलैपर्यंतची ठेवली होती. या मर्यादेत शासनाने सुधारणा केली असून आता ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज केलेल्या लाभार्थी महिलांना १ जुलै २०२४ पासून दरमहा १ हजार ५०० रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.

या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी १५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या ४ पैकी कोणतेही ओळखपत्र अथवा प्रमाणपत्र असल्यास ते ग्राह्य धरण्यात येणार आहेत. २ लाख ५० हजार रुपये उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल मात्र कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड असेल त्यांनी उत्पन्नाच्या दाखला देण्याची आवश्यकता असणार नाही.

या योजनेतून ५ एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष ऐवजी २१ ते ६५ वर्षे असा करण्यात आला आहे. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. या योजनेचा कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेलादेखील लाभ देण्यात येणार आहे.

मोबाईल ॲपद्वारे या योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रती लाभार्थी ५० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णयही शासनाने घेतल्याचे श्रीमती रंधवे यांनी कळविले आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने