विक्रम बनकर, अहिल्यानगर : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहरी सन २०२४ च्या स्वच्छ सर्वेक्षणाचे निकाल जाहीर झाले आहेत. यात ३ ते १० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटामध्ये अहिल्यानगर शहराचा देशात पाचवा क्रमांक आला आहे. तसेच, राज्यात अहिल्यानगरचा चौथा क्रमांक आला आहे. जलस्रोत, निवासी व मार्केट परिसर, शौचालयांची स्वच्छता आदींमध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेने केलेल्या कामगिरीत अव्वल गुणांकन देण्यात आले आहे. स्वच्छ शहरांमध्ये यंदाही थ्री स्टार मानांकन देण्यात आले आहे. महानगरपालिकेचे सर्व सफाई कामगार, इतर कर्मचारी, अधिकारी व नागरिकांच्या सक्रिय सहकार्यामुळे हे यश मिळाले असल्याचे सांगत आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
मागील वर्षअखेरीस झालेल्या सर्वेक्षणात शहरातील स्वच्छता गृहे, कचरा डेपोतील प्रक्रिया केंद्र, डम्पिंग साईट, शहरातील दैनंदिन साफसफाई, जलस्रोत आदींच्या स्वच्छतेची तपासणी करण्यात आली. तसेच, शहरातील सेप्टिक टँकमधून उपसला जाणारा मैला, त्यावर होणारी प्रक्रिया व त्यातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा उद्याने व इतर ठिकाणी वापर, दैनंदिन कचरा संकलन, कचरा वर्गीकरण आदी विविध घटकांमध्ये पथकांकडून तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये महानगरपालिकेने शहरात केलेल्या उपाययोजना, कचऱ्यावर होणारी प्रक्रिया, शहरातील स्वच्छता लक्षात घेऊन गुणांकन देण्यात आले. यात देशामध्ये शहराचा पाचवा क्रमांक आला आहे. तसेच, राज्यातील शहरांमध्ये अहिल्यानगर चौथ्या क्रमांकावर आहे.
महानगरपालिकेने स्वच्छतेच्या विषयात नेहमीच आग्रही भूमिका घेतली आहे. सातत्याने स्वच्छता अभियान, मोहिमा राबवणे, विविध संस्थांच्या सहभागातून स्वच्छता मोहीम राबवणे असे उपक्रम घेतले जातात. मागील वर्षात महानगरपालिकेने स्वच्छतेसाठी चांगले काम केले होते. त्यामुळे रिझल्ट चांगला आला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून घरातून होणाऱ्या कचरा संकलनात त्रुटी निर्माण झाल्या आहेत. ठेकेदार संस्थेकडून वाहनांची संख्या न वाढवण्यात आल्याने अनेक ठिकाणी कचरा संकलन सेवा विस्कळीत झाली आहे. यात उपाययोजना करून सेवा सुरळीत केल्या जात आहेत. सध्याच्या ठेकेदार संस्थेला मुदतवाढ न देता नवीन संस्था लवकरच नियुक्त केली जाणार असल्याचेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले.
टिप्पणी पोस्ट करा