Ahilyanagar : गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील धोकादायक इमारतींवर महानगरपालिकेने लावले फलक

ब्युरो टीम : अहिल्यानगर  महानगरपालिका प्रशासनाने शहरातील १५ अतीधोकादायक अवस्थेतील इमारती निश्चित केल्या आहेत. यात बहुतांश इमारती या मध्य शहरातील आहेत व त्यातील काहींचा वापरही सुरू आहे. या इमारती उतरवून घेण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले होते. त्यानुसार काही इमारती व काही इमारतींचा धोकादायक भाग उतरवून घेण्यात आला आहे. काही इमारतींबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने त्या काढता आलेल्या नाहीत. अशा इमारतींवर महानगरपालिकेकडून सूचना फलक लावण्यात आले आहेत. गणेशोत्सवात व मिरवणुकीवेळी या इमारतींजवळ किंवा इमारतींखाली थांबू नये, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.

धोकादायक अवस्थेत असलेल्या शहरातील १९७ इमारतींना नोटिसा यापूर्वीच बजावण्यात आल्या आहेत. तसेच, १५ इमारती अती धोकादायक अवस्थेत आहेत. या धोकादायक इमारतींवर कारवाई करून सर्जेपुरा व महाजन गल्ली येथील धोकादायक इमारत उतरवण्यात आली आहे. इतरही काही इमारती व इमारतींचे धोकादायक भाग उतरवून घेण्यात आले आहे. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेमुळे काही धोकादायक इमारतींवर कारवाई झालेली नाही.

गणेशोत्सव काळात व विसर्जन मिरवणुकीवेळी अशा इमारतींच्या ठिकाणी एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी दुर्घटना घडू नये, या इमारतींच्या परिसरात कोणीही थांबू नये, यासाठी या इमारतींवर महानगरपालिकेकडून सूचना फलक लावण्यात आले आहेत. नागरिकांनी अशा इमारतींच्या खाली उभे राहू नये, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने