Kolhapur : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडून 'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' अभियानाचा आढावा

ब्युरो टीम : राज्यातील नागरिकांचे आरोग्यमान सुधारण्यासाठी राज्य शासनाने 'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' हे महत्वाकांक्षी अभियान हाती घेतले आहे. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहूजी सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत आढावा बैठक पार पडली. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.जॅस्मिन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिपिंळे, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मोहम्मद देशमुख यांच्यासह आरोग्य विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाला अभियानातील विविध निर्देशकांची काटेकोर अंमलबजावणी करून प्रत्येक गाव आरोग्य दृष्ट्या स्वयंपूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. 

या अभियानांतर्गत जिल्ह्यात प्रामुख्याने संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोगांच्या नियंत्रणावर भर दिला जाणार आहे. क्षयरोग आणि कुष्ठरोग निर्मूलनासाठी १०० टक्के संशयित रुग्णांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ उपचाराखाली आणले जाईल. त्याचबरोबर, ३० वर्षांवरील प्रत्येक नागरिकाचे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कर्करोगासाठी तपासणी करण्याचे उद्दिष्ट आहे. जलजन्य आणि कीटकजन्य आजारांना प्रतिबंध करण्यासाठी गावागावात शुद्ध पाणीपुरवठा आणि डासोत्पत्ती स्थाने नष्ट करण्याच्या मोहिमा राबवल्या जाणार असून, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेसाठी ग्रामस्थांना प्रवृत्त केले जाणार असल्याची माहिती  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅस्मिन यांनी दिली.

माता आणि बाल आरोग्य हा या अभियानाचा केंद्रबिंदू असून, जिल्ह्यात १०० टक्के संस्थात्मक प्रसूती आणि गरोदर महिलांची वेळेत नोंदणी सुनिश्चित केली जाणार आहे. बालमृत्यू आणि मातामृत्यू शून्यावर आणण्यासाठी वात्सल्य कार्यक्रमांतर्गत गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपश्चात काळजी घेतली जाईल, तसेच ० ते ५ वयोगटातील बालकांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्यावर विशेष लक्ष दिले जाईल. याव्यतिरिक्त, किशोरवयीन मुला-मुलींच्या समस्या, ज्येष्ठांची काळजी आणि मानसिक आरोग्यासाठी तज्ज्ञांमार्फत समुपदेशन अशा विविध स्तरांवर काम करून जिल्ह्याचा आरोग्य निर्देशांक उंचावण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. 

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर हे राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आहेत. त्यांच्या पुढाकारातून अभियानाची अंमलबजावणी संपुर्ण राज्यात होत आहे. त्यामुळे हे अभियान केवळ शासकीय मोहीम नसून ती एक लोकचळवळ व्हावी, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी व्यक्त केली. अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना २५ लाखांपासून ५ कोटी रुपयांपर्यंतची बक्षीसे दिली जाणार असल्याने, गावांमधील स्पर्धात्मक वातावरण आरोग्य सुधारण्यास पोषक ठरेल. ग्राम आरोग्य स्वच्छता व पोषण समिती आणि महिला आरोग्य समित्यांच्या माध्यमातून तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचून 'आरोग्य' हा विषय लोकांच्या दैनंदिन चर्चेचा भाग बनवला जाणार आहे. बैठकीत नोडल अधिकारी डॉ. मोहम्मद देशमुख यांनी माहिती सादर केली. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने