ब्युरो टीम : शहरातील जलस्रोतांवरील वाढता ताण आणि यंदा अल निनोच्या परिणामामुळे मान्सूनला होत असलेला विलंब लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करून पाणी बचतीसाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत नागरिकांना पाणी बचतीसंदर्भात विविध उपाययोजनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी वाहन धुण्याचे टाळावे. व्यावसायिक वाहन धुलाई केंद्रांनी पाण्याचा पुनर्वापर करणाऱ्या यंत्रणांचा वापर करावा. तसेच खासगी व सार्वजनिक स्विमिंग पूलमध्ये नवीन पाणी भरणे शक्यतो टाळावे.
घरगुती तसेच व्यावसायिक आस्थापनांमध्ये फ्लश टँक, नळ, पाईपलाईन आणि इतर जलवाहिन्यांमधील गळती तात्काळ दुरुस्त करावी. पाण्याचा वापर कमी करण्यासाठी सर्व नळांना एरेटर्स बसविण्याचा आग्रह करण्यात आला आहे. पाणी वापरातील कार्यक्षमता वाढविणाऱ्या उपकरणांचा वापर करण्यास प्राधान्य द्यावे.
शहरातील उपलब्ध जलस्रोतांचा कार्यक्षम वापर आणि पाण्याची दीर्घकालीन उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक स्तरावर पाणी बचतीची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. नागरिकांनी घरगुती पातळीवर गळती रोखणे, एरेटर्सचा वापर करणे, वाहन धुण्यासाठी नळाचे पाणी टाळणे तसेच पावसाचे पाणी साठवण यंत्रणा कार्यान्वित ठेवणे, या उपाययोजनांचा अवलंब करावा. नागरिकांच्या सहकार्यामुळेच शहराची जलसुरक्षा अधिक मजबूत होईल, असे मत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी व्यक्त केले
तर पाणी बचत ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. सोसायट्या, व्यावसायिक आस्थापने, शैक्षणिक संस्था आणि उद्योगांनी नियमितपणे पाणी वापराचा आढावा घेऊन बचतीच्या उपाययोजना राबवाव्यात. रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा कार्यान्वित ठेवणे, पाण्याचा पुनर्वापर वाढविणे आणि अपव्यय टाळणे यामुळे भविष्यातील संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यास मोठी मदत होईल, असे पिंपरी चिंचवड महापालिकेचे कार्यकारी अभियंता महेश बरिदे यावेळी म्हणाले.
शहरातील सर्व गृहसंस्था, व्यावसायिक संकुले, शैक्षणिक संस्था, रुग्णालये आणि उद्योगांनी त्यांच्या परिसरातील रेन वॉटर हार्वेस्टिंग (पावसाचे पाणी साठवण) यंत्रणा तपासून त्या पूर्ण क्षमतेने कार्यान्वित ठेवाव्यात. यंत्रणांची साफसफाई, दुरुस्ती आणि देखभाल वेळेत पूर्ण करून पावसाचे पाणी भूगर्भात मुरविण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.
तसेच रस्ते, पदपथ, आवार किंवा वाहनांची अनावश्यक धुलाई, बागांना अतिरिक्त पाणी देणे, ओव्हरहेड टाक्यांमधून पाणी वाहून जाऊ देणे, अशा प्रकारचा अपव्यय टाळावा. सोसायट्या आणि व्यावसायिक आस्थापनांनी नियमितपणे पाणी वापराचा आढावा घेऊन बचतीच्या उपाययोजना राबवाव्यात.
पाणी हा केवळ नैसर्गिक संसाधन नसून भावी पिढ्यांसाठीचा अमूल्य ठेवा आहे. अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचा कालावधी अनिश्चित होत असून पाणी उपलब्धतेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. पाणी टंचाईसारख्या आव्हानांवर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने दैनंदिन जीवनात पाणी बचतीच्या सवयी अंगीकारणे आवश्यक आहे. वाहन धुणे, पाण्याचा अनावश्यक वापर टाळणे, पावसाचे पाणी साठवणे आणि जलसंवर्धनाच्या उपक्रमांमध्ये सहभागी होणे ही काळाची गरज आहे. पिंपरी चिंचवडकरांनी जबाबदार नागरिक म्हणून पुढाकार घेतल्यास शहराला शाश्वत जलव्यवस्थापनाचे आदर्श मॉडेल बनविता येईल.
-रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
यंदा अल निनोच्या परिणामामुळे पावसाचे आगमन अपेक्षेपेक्षा लांबणीवर पडल्याने जलसाठ्यांवर अतिरिक्त ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. वाढती लोकसंख्या, हवामानातील बदल आणि जलस्रोतांवरील ताण लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने पाणी बचतीची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. आज केलेली पाणी बचत उद्याच्या पिढ्यांसाठी अमूल्य ठरणार आहे. त्यामुळे पाणी जपा, पाणी वाचवा आणि जलसंवर्धनाच्या उपक्रमात सहभागी व्हा.
-डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

टिप्पणी पोस्ट करा