तर, लोक 'ईडी'ला 'बिडी'सारखे फुकतील, 'या'मंत्र्याची तुफान फटकेबाजी

          'सत्ता कोणाच्या बापाच्या मालकीची नसते. हे भाजपने लक्षात ठेवावे. त्यामुळे भाजप जे पेरत आहे, ते आगामी काळात उगवणार. केंद्रीय एजन्सीचा दुरुपयोग कोणाच्या मागे लावण्यासाठी केला जात असेल तर हे योग्य नाही. ही प्रथा भविष्यात सर्वांना अडचणीची आहे. उद्या महाराष्ट्रातील लोक चिडले तर 'ईडी'ला 'बिडी' सारखे फुकतील,' असा घणाघाती टोला मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी एकनाथ खडसे प्रकरणावरून भाजपला लगावला.
          ओबीसी जिल्हा मेळाव्यासाठी मंत्री वडेट्टीवार नगरमध्ये आले असता त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला.'आता राजकारणात बदला घेण्याची भावना वाढली आहे. पूर्वी मतभेद होते, पण मनभेद नव्हते. आता मात्र राजकारणात मनभेद वाढले आहेत . ही प्रवृत्ती वाढत असून हे लोकशाहीला पोषक नाही,' असे सांगतानाच वडेट्टीवार म्हणाले,'भाजपच्या कुटील, फोडाफोडीच्या राजकारणामुळे आमच्या हातातून अनेक राज्य गेले आहेत. देशाच्या राजकारणात असे कधी झाले नाही, की माणसे फोडून सरकार बनवले गेले. मात्र भाजपने पैशाच्या जोरावर, सत्तेच्या मस्तीत, फोडाफोडी करून गोव्यात, पूर्वोत्तर राज्यात, कर्नाटक, अशा विविध ठिकाणी सरकार बनवले आहे. जे फोडाफोडीचे प्रकार घडत आहेत, ते लोकशाही साठी चांगली बाब नाही. लोकशाही पायदळी तुडवून गुलाम बनवण्याचे, हुकूमशाहीकडे नेण्याची ही प्रवृत्ती आहे,' असा गंभीर आरोप त्यांनी भाजपवर केला. 'राज्यातील सत्तेमध्ये समान किमान कार्यक्रमावर आम्ही एकत्र आलो आहोत. कुठेही आमच्यात मतभेद नाही, आणि ते असण्याचे कारणही नाही. जोपर्यंत भाजपची जिरवत नाही, तोपर्यंत आम्ही एकत्र आहोत,' असेही त्यांनी सांगितले

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने