दिल्लीत जाऊन कोणते विकास प्रकल्प आणले- अंबादास दानवे शिंदे- फडणवीसांवर पलटवार

ब्युरो टीम: शिवसेनेचे नेते दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींसमोर नतमस्तक होत होते, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी शिवसेनेवर  केली आहे. फडणवीस यांच्या या टीकेचा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी समाचार घेतला आहे. देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत बऱ्याच चकरा मारल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांना वारंवार भेटले. आमच्यावर टीका करणाऱ्या फडणवीसांनी मोदी-शाहांकडून कोणते विकासाचे प्रकल्प आणले ते तरी सांगावेत, असं खुलं आव्हानच अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते. दानवे यांनी थेट शिंदे-फडणवीसांच्या दिल्लीवाऱ्या काढून भाजपला अडचणीत आणलं आहे. दानवे यांच्या आरोपवर फडणवीस काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

     मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये आज भाजपचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सेनेवर  सडकून टीका केली. फडणवीस यांच्या भाषणातील एकाएका टीकेचा अंबादास दानवे यांनी समाचार घेतला. कितने आदमी थे? असं म्हणू शकतो. 65 में से 50 निकाल गये, अब दोही बचे है, या फडणवीस यांच्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला आहे. पुढच्यावेळी आम्ही यापेक्षा डबल आमदार निवडून आणू, असं प्रत्युत्तर अंबादास दानवे यांनी दिलं.

भाजपला महाराष्ट्रापासून मुंबई तोडायचीय

      भाजपला महाराष्ट्रापासून मुंबई तोडायची आहे, असा दावाही त्यांनी केला. मुंबई जिंकणार, मुंबईवर भाजपचा महापौर बसवणार हे भाजप गेल्या 25 वर्षापासून सांगत आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे. त्यासाठी त्यांना मुंबई हवी आहे. भाजपला मुंबई-अहमदाबाद मेट्रो सुरू करायची आहे. पण त्यांना मुंबई-नागपूर मेट्रो नकोय. भाजपला विदर्भही वेगळा करायचा आहे. महाराष्ट्रापासून इतर प्रांत वेगळे करण्याचा त्यांचा डाव आहे. शिवसेना मात्र मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा डाव हाणून पाडेल, असा इशारा दानवे यांनी दिला.

-

मुंबई महाराष्ट्रापासून कुणीच तोडणार नाही

दरम्यान, भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेनेकडून होणाऱ्या आरोपांवरही फडणवीस यांनी भाष्य केलं होतं. जशी-जशी निवडणूक जवळ येईल, तसे भावनिक आवाहन वेग घेईल. मुंबई महाराष्ट्रातून तोडण्याचा डाव, अशी विधाने येतील. मुंबई तोडण्याची कुणाची हिंमत नाही. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडलं जाणार नाही. कारण संविधान आहे. पण मुद्दाम भ्रम तयार केला जात आहे. माझी त्यांना विनंती आहे की किमान डायलॉग तरी बदला, असा चिमटा फडणवीस यांना काढला.

----------


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने