विक्रम बनकर, अहिल्यानगर : अहिल्यानगर – कल्याण महामार्गावरील सीना नदीचा पूल गेली दोन वर्षांपासून रखडल्याने स्थानिक नागरिकांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. रविवारी( २५ मे) रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे नदीला पूर आला होता, त्यामुळे हा प्रमुख मार्ग जवळपास पाच तास बंद होता. यामुळे नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले.
या दरम्यान अनेक नागरिक जीव मुठीत घेऊन पूल ओलांडताना दिसले. त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
गेल्या वर्षी देखील अशाच प्रकारे पूर आल्याने दोन नागरिकांचा मृत्यू झाला होता. तरीदेखील प्रशासनाने या पूलाचे काम गतीने पूर्ण करण्याकडे दुर्लक्षच केले आहे. स्थानिक महापालिकेने देखील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या नाहीत.
नगर-कल्याण मार्गावर नवनिर्मित उपनगर विकसित होत असून, या परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा वावर असतो. त्या दृष्टीने हा पूल हा एकमेव प्रमुख मार्ग असून, त्याचे रखडलेले काम ही गंभीर बाब बनली आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने पूल पूर्ण करून सुरक्षित वाहतुकीसाठी पावले उचलण्याची मागणी केली आहे.
पहा व्हिडिओ
टिप्पणी पोस्ट करा