ब्युरो टीम : सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सुटावेत, त्यांच्या समस्यांचे निराकरण व्हावे आणि त्यांच्या नव्या कल्पनांना विकासकामांमध्ये स्थान मिळावे, या उद्देशाने खासदार मुरलीधर मोहोळ यांनी सुरू केलेल्या खासदार जनसंपर्क सेवा अभियानाचा दुसरा टप्पा सध्या सुरू असून या दुसऱ्या टप्प्यातील दुसरे अभियान रविवारी कसबा विधानसभा मतदारसंघात नागरिकांच्या उत्तम प्रतिसादात संपन्न झाले. कसबा विधानसभा मतदारसंघात झालेला हा दुसरा आणि सलग आठवा जनता दरबार होता. भर पावसातही या अभियानाला नागरिकांनी दिलेला प्रतिसाद निश्चितच समाधानकारक होता. यावेळी नागरिकांनी वैयक्तिक प्रश्न, सोसायट्यांचे विषय, नागरी समस्या आणि विकासकामासंदर्भात नव्या कल्पना याबाबत मंत्री मोहोळ यांची भेट घेतली. आलेल्या प्रश्नांच्या सोडवणुकीसंदर्भात संबंधित विभागांना तात्काळ सूचित केले असून येत्या काही दिवसांतच हे विषय निश्चितच मार्गे लागतील, असा विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केला.
पुण्यनगरीचा खासदार या नात्याने मंत्री मोहोळ यांच्या वतीने सर्वसामान्यांना नागरिकांचे प्रश्न सोडवण्याच्या उद्देशाने खासदार जनसंपर्क सेवा अभियान अर्थात जनता दरबार विधानसभा मतदारसंघनिहाय आयोजित केला जात आहे. कसबा विधानसभा मतदारसंघात रविवारी झालेला जनता दरबार हा सलग आठवा जनता दरबार असून पहिल्या सात जनता दरबारातील नागरिकांचे प्रश्न मार्गी लागले आहेत. यावेळी कसब्याचे आमदार हेमंत रासने, शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पुणे शहर तसेच कसबा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अभियानादरम्यान मोदी सरकार आणि महायुती सरकारच्या विविध योजना समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी योजनांचे स्टॉल्स विभागवार उपलब्ध करून देण्यात आले होते. शिवाय दाखल्यांसंदर्भातील अडचणी सोडण्यासाठीही वेगळ्या स्टॉलची उपलब्धता होती. यावेळी महापालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, महसूल, महावितरण यांच्यासह शासनाच्या विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यासंदर्भात माहिती देताना मंत्री मोहोळ म्हणाले, ‘भर पावसातही कसबावासियांनी या अभियानाला मोठा प्रतिसाद दिला. वैयक्तिक प्रश्नांसह नागरिक मला सार्वजनिक प्रश्न, सोसायट्याचे विषय आणि अपेक्षित विकासकामे याबाबत भेटले. जनता दरबार हा केवळ एक दिवसाचा इव्हेंट न राहता त्यावर दुसऱ्या दिवसापासूनच प्रश्न सोडवण्यासाठी कार्यवाहीला सुरुवात होते. या अभियानात सहभागी नागरिकांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचे समाधान एक लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितच मिळत असून माझ्या खासदारकीच्या संपूर्ण कार्यकाळात हा उपक्रम राबवला जाणार आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातील पहिल्या अभियानालाही उत्तम प्रतिसाद लाभला होता शिवाय दुसऱ्या अभियानाला ही संख्या वाढलेली आहे. याचाच अर्थ जनता दरबार पुणेकरांच्या पसंती संदर्भात असून आपले प्रश्न शोधण्यासाठी जनता दरबारात प्राधान्य देत आहेत. ही निश्चितच समाधान देणारी बाब आहे’
टिप्पणी पोस्ट करा