Pune : महिलांची जोखीम ओळखण्याची क्षमता समाजसुरक्षेसाठी महत्त्वाची — विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

ब्युरो टीम : विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या संकल्पनेतून "महिला सुरक्षितता, सणासुदीच्या काळातील कायदा व सुव्यवस्था आणि शहरातील आपत्ती व्यवस्थापन" या विषयांवर विशेष कार्यशाळेचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले. या कार्यशाळेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर प्रमुख उपस्थित असून त्यांनी विशेष मार्गदर्शन केले. मुंबई पोलीस, मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि महिला दक्षता समित्यांचाही यावेळी सहभाग होता.

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कार्यशाळेत बोलताना सणासुदीच्या काळातील कायदा व सुव्यवस्था, नैसर्गिक आपत्ती किंवा गर्दीच्या ठिकाणी महिलांची सुरक्षा ही प्राथमिक जबाबदारी असल्याचे सांगितले. महिला दक्षता समित्यांनी सक्रिय राहून स्थानिक पोलीस स्टेशन, बीट कॉन्स्टेबल आणि सामाजिक संस्थांशी समन्वय साधावा, असे त्यांनी आवाहन केले. महिलांवरील अत्याचार प्रतिबंध, स्त्री-पुरुष समानता, स्त्रीभ्रूणहत्या, कौटुंबिक हिंसाचार याविषयी जनजागृती करताना कायदेशीर तरतुदींची माहिती पोहोचवण्यावर त्यांनी भर दिला.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महिलांची जोखीम ओळखण्याची नैसर्गिक क्षमता समाजाच्या सुरक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की, महिलांची ही निरीक्षणक्षमता केवळ घरापुरती मर्यादित नसून सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः उत्सव आणि गर्दीच्या काळात, अत्यंत प्रभावी ठरते. महिलांचा सहभाग प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या कार्यात वाढला, तर गुन्हे रोखणे आणि आपत्ती टाळणे अधिक सोपे होईल, असे ते म्हणाले. त्यांनी महिला दक्षता समित्यांच्या कार्याचे कौतुक करताना गणेशोत्सव काळात अशा समित्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे मार्गदर्शन करण्यावर भर द्यावा, अशी सूचना केली.

मुंबई पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी महिलांच्या संरक्षणासाठी पोलीस दलाने उभारलेल्या यंत्रणांची माहिती दिली. निर्भया पथक, महिला मदत कक्ष, स्पेशल जुवेनाइल युनिट, मोबाइल फॉरेन्सिक युनिट आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष या विभागांचा उत्सव काळात अधिक सक्रिय वापर करण्याचे त्यांनी सांगितले.

बॉम्बस्फोट विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गावडे यांनी गर्दीच्या ठिकाणी आणि मिरवणुकीदरम्यान संशयास्पद हालचाली ओळखण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले. "कोणतीही संशयास्पद वस्तू, पिशवी किंवा वाहन आढळल्यास त्वरित पोलीसांना कळवा," असे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन संचालक महेश नार्वेकर यांनी गणेशोत्सव काळातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची माहिती दिली. पावसाळा आणि समुद्रातील भरती-ओहोटीच्या पार्श्वभूमीवर जलप्रलय किंवा इतर नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी महापालिकेने सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी १९१६ या हेल्पलाइनचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खासगी सचिव अविनाश रणखांब यांनी केले, तर आभार प्रदर्शन विशेष कार्य अधिकारी प्रशांत पिसाळ यांनी केले. या कार्यशाळेतून महिलांची सुरक्षा ही केवळ पोलीस किंवा प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचा ठाम संदेश देण्यात आला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने