ब्युरो टीम : अहिल्यानगर जिल्ह्यातील आगडगाव येथील काळ भैरवनाथ देवस्थानाजवळ गेल्या वर्षभरापासून आठवड्यास सुरू असलेल्या कीर्तन महोत्सवाची सांगता रविवारी (ता. २८) होणार आहे. त्यानिमित्त ५२ संतांचे पूजन व संतमेळावा होणार असल्याचे देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले.
आगडगाव येथे जानेवारीपासून प्रत्येक रविवारी सायंकाळी कीर्तन व महाप्रसाद असा उपक्रम सुरू होता. त्याअंतर्गत गेले वर्षभर ५२ महाराजांची कीर्तनसेवा झाली. या उपक्रमाची सांगता संतपूजनाने करण्यात येणार आहे. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता महाराजांची गावातून मिरवणूक निघेल. डोंगरगणचे महंत जंगले शास्त्री महाराज, तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज, आळंदीचे ज्ञानेश्वर माऊली कदम आदी महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. या वेळी आमदार विक्रम पाचपुते, जिल्हा बॅंकेचे संचालक अक्षय कर्डिले तसेच मान्यवर उपस्थित राहतील.
देवस्थानाजवळ प्रत्येक रविवारी आमटी-भाकरी असा महाप्रसाद सुरू असतो. त्यासाठी राज्यभरातून भाविक येतात. रविवारी होणाऱ्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा