ब्युरो टीम : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे येणारा सिंहस्थ कुंभमेळा २०२७ हा केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा सोहळा आहे. याच पार्श्वभूमीवर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक सविस्तर निवेदन पाठवून नियोजन, अंमलबजावणी आणि समन्वयाच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन व कृतीची विनंती केली आहे.
दिनांक २३ मे २०२५ रोजी नाशिक येथे विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त, नाशिक महानगरपालिका, आरोग्य, बांधकाम आणि इतर संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीदरम्यान सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसंदर्भात सखोल चर्चा झाली.
डॉ. गोऱ्हे यांनी या पत्रात उल्लेख केला आहे की, महिलांपासून ज्येष्ठ नागरिक, बालक आणि दिव्यांग भाविकांसाठी स्वतंत्र व सुरक्षित चेंजिंग रूम, ‘हिरकणी कक्ष’, तसेच मदत केंद्र व महिला पोलीस अधिकारी यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. गर्दीमुळे हरवलेली बालके सुरक्षितरित्या पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष यंत्रणा उभारावी, अशीही त्यांनी विनंती केली.
गोदावरी स्वच्छता अभियानास अधिक गती देणे, शौचालये, मैला व्यवस्थापन, घनकचरा प्रक्रिया आणि पर्यावरणपूरक उपाययोजना राबवण्यावरही त्यांनी भर दिला. या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षितता साधने व आवश्यक लसीकरण देण्यावरही त्यांनी लक्ष वेधले आहे.
सिंहस्थ मेळ्यात सहभागी होणाऱ्या लाखो भाविकांसाठी वाहतूक व्यवस्था आणि सार्वजनिक सोयीसुविधा सुलभ व सुगम होण्यासाठी विशेष बसेस, पायी मार्गांचे नियोजन, महिलांसाठी स्वतंत्र स्नानगृह, तसेच चांदवड, शिर्डी, शनि शिंगणापूर, सप्तश्रृंगीगड यांसारख्या महत्त्वाच्या धार्मिक स्थळांशी दळणवळण सुधारण्याची शिफारस केली आहे.
आरोग्य सेवांच्या दृष्टिकोनातून, खाजगी आणि धर्मादाय रुग्णालयांचा सहभाग सुनिश्चित करणे, तात्पुरती आरोग्य केंद्रे उभारणे, तपासणी शिबिरे आणि ॲम्ब्युलन्स सेवा कार्यान्वित करणे या बाबींवरही त्यांनी भर दिला आहे.
धार्मिक व सांस्कृतिक वातावरण अधिक समृद्ध करण्यासाठी प्रवचन, सत्संग आणि स्थानिक-राष्ट्रीय कलाकारांच्या सहभागातून कार्यक्रमांचे आयोजन करण्याची शिफारसही करण्यात आली आहे. श्रद्धा व संस्कृतीचा संगम साधणारे उपक्रम राबवण्यावर डॉ. गोऱ्हे यांनी विशेष भर दिला आहे.
कुंभमेळ्यात सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहर आणि ग्रामीण भागांमध्ये सायबर सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना राबवण्याची गरज त्यांनी नमूद केली आहे. गर्दीचे व्यवस्थापन व माहिती तंत्रज्ञानाचा उपयोगही प्रभावीपणे करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी नाशिकमधील सर्व प्रमुख मंदिरांची माहिती एकत्र करून प्रचार व प्रसार करणे, मंदिरांकडे जाणाऱ्या रस्त्यांची डागडुजी आणि पायाभूत सुविधा सुधारण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आराखड्याची पारदर्शकता राखण्यासाठी तो विधिमंडळ सदस्यांना उपलब्ध करून द्यावा आणि सर्व लोकप्रतिनिधींना नियोजनात सक्रिय सहभागी करून घेण्याचे आवाहन त्यांनी पत्रात केले आहे.
या निवेदनाच्या माध्यमातून डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली असून, संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम केल्यास सिंहस्थ कुंभमेळा २०२७ हे आयोजन देशासाठी एक आदर्श ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
टिप्पणी पोस्ट करा