प्रत्येक वर्षी विसर्जनावेळी मोठ्या प्रमाणात निर्माल्य पाण्यात मिसळल्याने जलप्रदूषण वाढते. या समस्येवर मात करण्यासाठी शहरभरात निर्माल्य संकलन कुंडे बसवण्यात आली आहेत. या कुंड्यात जमा झालेले निर्माल्य पुढील प्रक्रिया करून सेंद्रिय खत निर्मितीसाठी वापरले जाणार असून, त्याचबरोबर त्यावर प्रक्रिया करून सुगंधी द्रव्ये तयार करण्याचाही उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी निर्माल्य नदीपात्रात न टाकता निर्माल्य संकलन कुंडामध्ये टाकावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
या उपक्रमामुळे केवळ नदी-नाल्यांतील प्रदूषण कमी होणार नाही, तर जमा झालेले निर्माल्य सेंद्रिय खत आणि सुगंधी द्रव्य निर्मितीसाठी वापरल्याने पुनर्वापर संस्कृतीला चालना मिळणार आहे. शहरात स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकास या तिन्ही उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.
गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांनी आवर्जून निर्माल्य कुंडांचा वापर करावा. नद्या, तलाव स्वच्छ ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळाल्यास हा उपक्रम यशस्वी होईल आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव आपल्याला साजरा करता येईल.
– सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
टिप्पणी पोस्ट करा